सूतमुनी नारदाच्या तपश्चर्येची कथा सांगू लागले: पूर्वी नारद एका दासीच्या पोटी जन्मला. ती दासी एका भागवत्तोमाच्या घरी काम करीत असे. त्या गवत्तोमाच्या घरी नेहमी थोर ऋषी व मुनी येत आणि त्यांचे तो चांगले आतिथ्य करी. नारद फार लहान होता, तरी त्या बाल्यावस्थेतही तो त्यांना पाणी प्यायला आणून देई. अशाच प्रकारे त्यांची लहानमोठी कामे करून त्यांची सेवाचाकरी करी.
त्या वेळी ज्ञानी मुनी आपसांत थोर ज्ञानाच्या व विष्णूच्या मायेच्या गोष्टी बोलत. नारद त्या आनंदाने ध्यानपूर्वक ऐकत असे. पाणी म्हणजे ‘नीर’, ते देणारा म्हणून मुनी त्याला ‘नारद’ म्हणून हांक मारीत. नारदाच्या बालवयांतच त्याची आई साप चावल्याने मरण पावली. त्या बालकाला त्याचा बाप कोण, काय, कांही माहीत नव्हते. बरोबरची मुलें नारदाला ‘दासीपुत्र’, म्हणून त्याच अपमान करीत.
पुढे कांही दिवसांनी त्याचा मालक भागवतोत्तम ब्राह्मणसुद्धां निर्वतला. नारद निराश्रित होऊन, भुकेने जीव कासावीस झाल्यासारखा दारोदारी फिरू लागला. त्याला ‘चोर’ म्हणून लोक हांकलू लागले. खट्याळ मुलें दगडधोंडे मारून रडवीत आणि त्यांतच त्यांना गंमत वाटे. ‘‘मी कशाला जन्मलो? मी असं काय पाप केलं की मला इतक्या अन्यायाने हे लोक मारहाण करतात? कृमीकीटक व जनावरे सुद्धा रानावनांत स्वच्छंदपणे हिंडतात, फिरतात!’’ असा विचार करीत नारदाने गांव सोडून जंगलाची वाट धरली. त्याला मुनी आपसात बोलत, त्या गोष्टींची आठवण झाली.
‘‘मी तपश्चर्या कां करू नये? कुलीन कुटुंबात मी जन्मलो पाहिजे!’’ असे ठरवून नारदाने तपश्चर्या सुरु केली. ‘‘अनाथांचा नाथ? या त्रिलोकाचा जो पिता तोच माझे सर्वस्व! त्याने मला कसंही ठेवावे, मला ते मान्य!’’ असे मनाशी ठरवून नारदाने तपश्चर्या केली. नारदाचे तप फळाला आले. त्याच्यावर तेजोमय प्रकाशाचा झोत पडला.
|