ipad/iphonetopBanner

कहाण्या

पाताल दुर्ग- 2

लेखक: चांदोबा | 18th Oct, 2011


मग उग्रसेनाचे चारही दूत त्या दोन कैद्यांजवळ गेले आणि त्यांना फटकारे मारीत परत घेऊन निघाले. कैद्यांपैकी धूमक संतापाने लालबुंद झालेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पहात म्हणाला, ‘‘शीः, दुष्ट!’’ पण, फटकारे बसूनही सोमकने मात्र हूं की चूं केले नाही, कीं त्याच्या चेहर्‍यावर वेदनेची किंचितशीही छटा दिसली नाही. दूतांपैकी एकजण त्यांच्याजवळ येऊन दांत विचकत म्हणाला, ‘‘याद राखा! स्वतःच्या बायकामुलांना विसरू नका!’’

कैद्यांना घेऊन सर्व दूत दरबारातून बाहेर पडले. ते गेलेल्या दिशेला राजा शतमानू एकटक पहात होता. तो म्हणाला, ‘‘महामंत्री, उग्रसेनच मारेकरी आहे, हा माझा अंदाज आता आणखी दृढ झाला आहे. पण तो असा धोकेबाजपणा कां करतो आहे? त्याच्या या वागण्यामागे काय उद्देश असेल, हे लक्षांत येत नाही. उग्रसेनाने आपल्याकडे कैद्यांना कशासाठी पाठवले?’’

‘‘महाराज, मला वाटते या प्रकारामागे मोठे कटकारस्थान असावे. इतकेच नव्हे तर मला असेही वाटते कीं, शशिकांत अजूनही जिवंत आहे’’ महामंत्री गंगाधर म्हणाला. ‘‘शशिकांत सुखरूप परत यावा, असे मलाही वाटते. आपला भद्र घायाळ होऊनही राजधानीला परत आला आहे, हे बहुधा उग्रसेनाला माहीत नसावे. या दूतांच्या बोलण्यावरून असे वाटते कीं, तिघेही जंगलातच मरण पावले, असा त्यांचा समज झाला आहे.’’ शतमानू म्हणाला.

‘‘इथे येण्यापूर्वी प्रत्येक दूताला असेच वाटत असणार. परंतु आता नगरवासियांच्या चर्चेतून भद्र इथे पोचल्याचे त्यांना समजेल. तेव्हां, भद्रच्या पाठीतून बाण काढताक्षणींच तो मरण पावला, असे मी जाहीर करून टाकतो’’ गंगाधर म्हणाला. ‘‘त्याचा काय उपयोग होईल?’’ शतमानूने विचारले. ‘‘ही बातमी दूतांकरवी, किंवा या ना त्या प्रकारे उग्रसेनाला समजेलच. मग, जंगलात काय घडले ते आपल्याला समजले नसणार,या भ्रमांत तो राहील आणि ते आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
 


गोष्‍टींविषयी

BannerBanner